जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । सध्या देशातील विविध शहरातून वंदे भारत एक्सप्रेस धावत असून त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसादही मिळताना दिसत आहे. परंतु जळगाव आणि भुसावळ मार्गे अद्यापही एकही वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीय. अशातच जळगावकरांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा संपणार आहे.

कारण पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष याच महिन्यात ही ट्रेन धावणार असल्याची माहिती आहे. यामुळे जळगावकरांना पुण्याला जाण्यासाठी जलद गाडी मिळणार असून यामुळे प्रवासाची वेळही वाचणार आहे.

नागपूरमधील अजनी येथून ही वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. विशेष या ट्रेनमुळे जळगावकरांना मोठा फायदा होणार आहे. कारण नोकरी, शिक्षण, व्यवसाय साठी जिल्ह्यातील अनेक जण ये-जा करतात. त्यात भुसावळ आणि जळगाव स्थानकावरून पुण्याला जाण्यासाठी मोजक्यात गाड्या धावत असल्याने तिकीट मिळणे कठीण असते. जळगावहुन पुण्याला विमानसेवा सुरु असली तरी ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तर बसेसने खूप वेळ लागतो.
यातच आता पुणे ते नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेस याच महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती असून यामुळे जळगावकरांना पुण्यासाठी जलद गाडी उपलब्ध होणार आहे. पुणे- नागपूर (अजनी) वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली तर जळगाव – पुणे हाच प्रवास ६ ते ६.३० तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा २-३ तासांचा वेळ वाचणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
कोण-कोणत्या स्थानकांवर थांबत?
पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळेल.











