५९ लहान मुलांची तस्करी पकडली; जळगावात २९ चिमुकल्यांची सुटका

मे 31, 2023 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज : ३१ मे २०२३ : मदरशाच्या नावाखाली बिहारमधून सांगलीमध्ये ५९ लहान मुलांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या सतर्केतेमुळे उधळून लावण्यात यश आले आहे. ‘ऑपरेशन आहट’ अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत दानापूर – पुणे एक्सप्रेस (०१०४०) धावत्या गाडीत भुसावळ ते मनमाड मध्ये केलेल्या तपासणीत ५९ लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात जळगाव रेल्वेस्थानकावर २९ चिमुकल्यांची तर मनमाड रेल्वे स्थानकावर ३० मुलांची सुटका करण्यात आली आहे. याकारवाईमुळे राज्यात मानवी तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

Child trafficking jpg webp

गाडी क्रमांक ०१०४० दानापूर – पुणे एक्सप्रेस मध्ये मदरशाच्या नावाखाली बिहार मधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली रेल्वे प्रशासनाला मिळाली होती. यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी ऑपरेशन आहट अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत धावत्या प्रवासी गाडीतून ८ ते १५ वयोगटातील मुलांची तस्करी करणार्‍या ५ इसमासह ५९ बालकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्कप्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकातुन गाडी सूटल्यानंतर मनमाड स्थानका पर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर धावत्या रेल्वे गाडीत मनमाडपर्यंत केलेल्या तपासादरम्यान आणखी ३० मुले आणि ४ तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्थानकात ताब्यात घेण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर बीएसएलमधून सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला पाठवण्यात आले. चाइल्ड वेल्थ सेंटरच्या निर्देशानुसार बालगृह/जळगाव येथे सुटका करण्यात आलेली मुले सुपूर्द करण्यात आली. मनमाड येथे सुटका करण्यात आलेली मुले चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ/नासिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून त्यांना ३१ मे रोजी हजर केले जाईल.याप्रकरणी मनमाड आणि भुसावळ येथे भादंवी ५७७ / २३ अन्वये ३७० तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now