⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नापिकीला कंटाळून ३९ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । नापिकीला कंटाळून यावल तालुक्यातील कासारखेडा येथील ३९ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

कासारखेडा (ता.यावल) येथील शेतकरी समाधान उर्फ छोटू रतन पाटील (वय-३९) यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्याच शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. समाधान पाटील यांनी त्यांच्या शेतात कापसाची लागवड केली होती. मात्र, कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यानंतर त्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र, कांद्याचे देखील नुकसान झाले होते. या नापिकीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

समाधान पाटील यांनी विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना आडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.