जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित “जनरेटिव्ह एआय अँड क्वांटम कॉम्प्युटिंग” या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) चा समारोप नुकताच करण्यात आला.

ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पहिल्या दिवशी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील प्रा. प्रमोद बिडे यांनी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलतत्त्वे, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तसेच विविध क्षेत्रांतील जनरेटिव्ह एआयच्या उपयोजना तर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील डॉ. प्रीती पाटील यांनी शिक्षण, उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील जनरेटिव्ह एआयचे विविध उपयोग,विषद केले. दुसर्या दिवशी एल. आर. तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मीरा रोडचे प्राचार्य डॉ. उमेश भदादे यांनी जनरेटिव्ह एआयमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान,मल्टीमोडल एआय आणि रॅग आर्किटेक्चर तर न्युटॅनिक्स प्रा. लि. चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी मयूर पाटील यांनी एआय एजंट्स, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या व्यावहारिक उपयोगांवर प्रकाश टाकला.
तिसर्या दिवशी क्वांटम कॉम्प्युटिंगच्या मूलभूत संकल्पनांवर विशेष सत्रात प्रा. प्रमोद बिडे यांनी क्यूबिट्स, सुपरपोझिशन, एन्टँगलमेंट, क्वांटम गेट्स आणि पारंपरिक संगणनाच्या तुलनेत क्वांटम संगणनाचे फायदे तर एनएमआयएमएस मुंबई येथील प्रा. भावना बोस यांनी क्वांटम कॉम्प्युटिंगमधील गणितीय संकल्पना, संशोधनातील प्रगती आणि भविष्यातील संशोधनाच्या संधींवर मार्गदर्शन केले.चौथ्या दिवशी आयोजित विशेष सत्रांमध्ये प्रा. भावना बोस यांनी ग्रोव्हरचा शोध अल्गोरिदम, शोरचा अल्गोरिदम, क्वांटम क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम सायबर सुरक्षा, क्वांटम प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म्स या महत्त्वपूर्ण विषयांचे विवेचन केले.
अंतिम दिवशी “जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग : नवकल्पना, संशोधनाच्या संधी आणि भविष्यातील दिशा” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.तर डॉ. विजय ए. कोतकर यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधन, नवउद्योजकता, उद्योग-अभ्यासक सहकार्य आणि करिअरच्या नव्या संधी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. निलेश एस. वाणी, सहसंयोजक प्रा. प्रशांत शिंपी आणि समन्वयक डॉ. निलेश वाय. चौधरी यांनी नियोजन केले तर प्रा. शिरीन पिंजारी यांनी आभार मानले.यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी संगणक अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन केले.









