⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील १८ जिल्हे पूर्ण ‘अनलॉक’

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे. दरम्यान, अनलॉक नियमांची अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली.

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.

रुग्णवाढीचा वेग अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार  आहे.

पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांचा समावेश

पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशिम, जळगावचा समावेश आहे.

काय सुरु राहणार?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने, इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार?

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात 5  जिल्हे

तिसरा 10 जिल्हे

चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे