⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Zp Election : विशाल देवकर यांनी जि.प.निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । जिल्ह्यात सध्या पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व विशाल देवकर (Vishal Deokar) यांनी उतरावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याच बरोबर सर्वशक्तीनिशी कार्यकर्ते त्यांच्यासाठी मैदानात उतरतील, अशी ग्वाही देखील कार्यकर्त्याने दिली. (Jalgaon ZP Election)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांचे सुपुत्र विशाल देवकर यांचा आज शनिवारी (दि. १८) रोजी वाढदिवस होता. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. याबाबत विशाल देवकर यांनी काहीही स्पष्ट केले नसले, तरी कार्यकर्त्यांमधील दांडगा उत्साह पाहता ते पुढे याबाबत काय निर्णय घेतात, याकडे मतदार संघाचे लक्ष लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीत दहा गटांची वाढ होऊन सदस्यसंख्या 68 वरून 78 झाली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी आतापासूनच आपापल्या गटात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर गटांची आरक्षण सोडत लांबणीवर पडली आहे. गटाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गटात इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येणार आहे. यातच प्रत्येक राजकीय पक्षाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असल्याने सर्व गटांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भाजपचे उमेदवार निवडणूक लढताना दिसणार आहेत. ही स्थिती पाहता जळगाव ग्रामीण मतदार संघातील देवकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात विशाल देवकर यांनी दोन्ही तालुक्‍यांपैकी कोणत्याही गटात निवडणूक लढवावी, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून, अथक परिश्रम करून निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल, अशी प्रांजळ भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

एवढेच नव्हे; तर कोणताही इच्छुक कार्यकर्ता विशाल देवकर यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आता विशाल देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की नाही, उतरले तर दोन्ही तालुक्यांतील कोणत्या गटातून ते निवडणूक लढवतील याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली, तर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका युवा नेतृत्वाचा उदय होणार आहे.