जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२५ । वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचं सांगत गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७) या कंत्राटी वायरमनला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईने खळबळ उडाली असून लाचखोर वायरमनविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरणच्या प्रभात कॉलनी युनिटच्या कक्षेत येणाऱ्या परिसरात जुने घर खरेदी केलेल्या ४६ वर्षीय तक्रारदाराने विकत घेतलेल्या घराचे वीज मिटर नावावर करण्यासाठी अर्ज केला होता. त्याची पडताळणी करण्यासाठी भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७) हा कंत्राटी वायरमन शनिवारी त्यांच्या घरी गेला. त्याने तुमच्या मिटरचे सील तुटलेले आहे. तुम्ही मिटरमध्ये छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होवुन वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी चौधरीने तक्रारदारांकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत मंगळवारी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचला आणि ५ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. कंत्राटी वायरमन चौधरी हा दोन वर्षांपूर्वीच महावितरणमध्ये कामाला लागला आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता काहीही आढळून आले नसल्याचे एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी सांगितले, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मागर्दशर्नाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, चालक सुनील वानखेडे व अमोल सूर्यवंशी या पथकाने ही कामगिरी केली.