जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून 200 पेक्षा अधिक वर्षे झाली मात्र उपग्रह, अणूचाचणी, महिलांचा सन्मान, शस्त्रास्त्र निर्मिती मध्ये जे यश संपादन केले ते भारताने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात प्राप्त केले असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले. ते खान्देश कॉलेज सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील अमृतकण’ या विषयावर मुख्य वक्ता म्हणून भाषण करीत होते, सदर कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.

जयसिंग वाघ पुढं आपल्या भाषणात म्हणाले की स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आम्ही संविधान निर्माण केले. काश्मीरला भारतात विलीन केले, सिक्कीमला भारतात विलीन केले पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात यश मिळविले, बांगलादेश निर्माण केला, खलिस्तान, बोडो, गोरखा या चळवळी शांत केल्या, पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या पदावर महिला विराजमान झाल्या, उपग्रहात नासाची बरोबरी केली, अंतराळात शंभर पेक्षा अधिक उपग्रह सोडले, संगणकात जागतिक क्रांती केली, ३७० वे कलम रद्द केले, तीन तलाक पद्धत रद्द केली असे कितीतरी अमृतकण आम्ही निर्माण करू शकलो, तिसरी जागतिक महासत्ता म्हणून आम्ही बरीच मजल गाठली या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी नीट अभ्यासून स्वातंत्र्या विषयी गंभीर व्हावे व उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन वाघ यांनी केले, वाघ यांच्या भाषणाने प्राध्यापक व विद्यार्थी खूप प्रभावीत झाले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. आर राणे होते. त्यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्राच्या लढ्याचा इतिहास अतिशय प्रेरणादाई व रोमांचकारी असल्याचे सांगून अनेकांच्या बलिदानातून ते आपल्याला मिळाले असल्याने त्याविषयी आपण गंभीर असावे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ध्यानात घ्यावे असे आवाहन केले.
सुरवातीस जयसिंग वाघ यांचा शाल, बुके देऊन प्राचार्य डॉ. ए. आर राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा . डॉ.कुंदा बाविस्कर, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. स्वाती चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कर्मचार, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते











