⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मनपातील नगरसेवकांमुळेच वॉटरग्रेसचे फावताय : दिपककुमार गुप्ता

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींमुळेच वॉटरग्रेस कंपनीच फावत आहे. वॉटरग्रेस कंपनी लोकप्रतिनिधींना दर महिन्याला काही रक्कम देत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे हे सर्व लोक वॉटरग्रेस विरोधात काहीही बोलायला धजावत नाहीत. असा दावा ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला.

यावेळी ते म्हणाले की, वॉटरग्रेस कंपनी नागरिकांना सोडा तर वॉटरग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सुविधा देत नाही. त्यांचे देखील हाल होत आहेत. याचबरोबर वजन वाढवण्यासाठी घंटागाड्यांमध्ये माती भरली जात आहे. याबाबतची माहिती मी नुकतीच आयुक्तांना दिली होती. मात्र त्यांच्याकडूनही काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे मनपातील काही नगरसेवक सोडल्यास बाकी सर्व वॉटरग्रेस कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते घेत असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये विरोधी पक्षातील व सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक याच बरोबर महापौर, उपमहापौर यांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. असे दीपककुमार गुप्ता म्हणाले. मात्र याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ‘मी पैसे घेत नाही’ असे स्पष्ट सांगितल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रशासन लाचार झाले आहे, मनपातील अधिकारी हे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा स्वतः देखील कोणत्यातरी स्वार्थासाठी वॉटरग्रेस वर कोणतीही कारवाई करत नसल्याचे दीपककुमार गुप्ता म्हणाले.

पुढे ते असेही म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी त्यांनी वॉटरग्रेसच्या गाड्या सुस्थितीत याव्यात त्यांना विमा मिळावा .त्यांची आरटीओ मार्फत पासिंग हवी यासाठी पाठपुरावा केला होता. पर्यायी वॉटर ग्रेसच्या 143 घंटागाड्यांचा विमा व पासिंग करण्यात आली होती. असेही त्यांनी सांगितले. याच बरोबर आपल्या महापालिकेने नव्या गाड्या या संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. इतर महानगरपालिकांमध्ये नव्या गाड्या ठेकेदाराला दिल्या जात नाहीत. उलट ठेकेदाराला विकत घ्याव्या लागतात. मात्र, आपल्या मनपाने नव्या गाड्या वॉटर ग्रेसला दिल्या आहेत. येत्या काळात चार ते पाच वर्षे ते या गाड्या वापरतील त्यांनतर, जेव्हा या गाड्या पुन्हा मनपाला मिळतील त्यावेळेस या गाड्यांची स्थिती अक्षरशः खराब झाली असेल. असं असूनही याकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे दीपककुमार गुप्ता ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलताना म्हणाले