जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२६ । राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसू लागला आहे. मुंबईसह अनेक भागांत सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, ११०५७ क्रमांकाची मुंबई–अमृतसर एक्स्प्रेस आज (८ जुलै) रद्द करण्यात आली आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणारी ही अत्यंत महत्त्वाची ट्रेन रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस ही उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, भुसावळ आणि खंडवा मार्गे पंजाबकडे जाणारी एक अत्यंत गर्दीची आणि महत्त्वाची ट्रेन आहे. आज अचानक ही ट्रेन रद्द करण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली.

मुंबईत रुळांवर पाणी साचल्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिराने चालवल्या जात आहेत.
दरम्यान, राज्यात पुढील २४ तासही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







