⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्वरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । जळगाव येथील कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली.

डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर डॉ. विजय माहेश्‍वरी यांची वर्णी लागली असून ते विद्यापीठाचे सातवे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारतील. या माध्यमातून विद्यापीठातील प्रभारी कुलगुरू राज संपणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्‍वरी हे विद्यापीठातील बायो-केमीस्ट्री या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठातून बी.एस्सी. आणि नंतर बायोकेमिस्ट्रीत एम.एस्सी आणि पीएच.डी. संपादन केली आहे. प्रोटीन बायोकेमिस्ट्री, बायो टिश्यू कल्चर आदी त्यांच्या अध्ययनाचे विषय होते. १९९४ साली राष्ट्रीय पातळीवरील यंग सायंटीस्ट पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

डॉ. पी. पी. पाटील यांच्या नंतर पुन्हा एकदा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची धुरा ही विद्यापीठातीलच विभाग प्रमुखाकडे आल्याची बाब लक्षणीय आहे.