⁠ 
सोमवार, मे 6, 2024

दुर्दैवी! आमोदे येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। अमळनेर तालुक्यातील आमोदे येथील तरुण शेतकऱ्याचा शेतातील विजेचा पोल जवळील ताण दिलेल्या ताराला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ४ रोजी दुपारी घडली.

याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आमोदे येथील कैलास भालेराव पाटील (वय ३६) हे ४ रोजी दुपारी शेतात काम करत होते. शेतातील विजेच्या खांबाजवळील ताण दिलेल्या तारेला स्पर्श होताच त्यांचा विजेचा धक्का लागला.

दरम्यान, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कैलासचे चुलत बंधू जितेंद्र अमृत पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलिस करत आहेत.