⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

तळई येथे अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । एरंडोल तालुक्यातील तळई येथे आज दि. ९ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान दोन वेगवेगळ्या भागात विज पडून दोन जण ठार झालेत.तर सात जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विक्रम दौलत चौधरी (५५) हे पाऊस सुरू झाल्याने घरी परतत असताना त्यांच्या डोक्यावर विज पडल्याने डोके फाटून जागीच ठार झाले. सदर घटना ही त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर घडली ते शेतात मृत होऊन पालथे पडलेले होते.त्यांना त्याठिकाणी जात असलेल्या मजूर महिलांनी पाहिल्यावर  गावात सांगितले. त्यांचे शवविच्छेदन कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , सुना असा परिवार असून ते अगदी मनमिळाऊ स्वभावाचे होते.गावात त्यांचे कोणाशीही वैर नव्हते.

दुसऱ्या घटनेत आज दि ९ जुन रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान ब्राम्हण मळा भागातील स्वतःच्या शेतात गेलेला भुषण अनिल पाटील (१८) आकारावी पास झालेला तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ व आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हा पाऊस सुरू झाल्याने शेतातील भोकरच्या झाडाखाली आठ जणांच्या घोळक्यामध्ये मधोमध बसलेला होता.परंतु अचानक भुषणच्या अंगावर विज पडल्याने तो जागेवर बेशुद्ध झाला. त्यास बेशुद्ध अवस्थेत तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन गेले त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता मयत घोषित केले. त्याचे शवविच्छेदन एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

भुषण याच्या सोबत आजूबाजूच्या शेतात काम करणारे रमेश कौतिक धनगर (६५), योगेश रविंद्र धनगर (१८), निवृत्ती रमेश धनगर (३५), संदीप वामन वाघ(३५), सुरेश हरी पाटील (३२), बापू आनंदा धनगर (४२), विजय नामदेव नाईक (२६) हे सर्व जखमी झाले आहेत. सर्व गोविंदा गिरधर धनगर यांच्या शेतातील भोकरच्या झाडाखाली पाऊस सुरु असल्यामुळे थांबलेले होते.त्याच्या सोबत असलेल्यांपैकी रमेश धनगर यांच्या छातीवरील केस जळाले तसेच त्यातील उर्वरितांना किरकोळ इजा झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.