..आता तुरीचे भावही घसरले; शेतकरी चिंतेत, जळगावात प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । एकीकडे कापसासह सोयाबीनला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. यातच दुसरीकडे तूर लागवडीतून तरी पैसा हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा असतानाच तुरीचे भाव देखील घसरले आहे. गेल्या आठ दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
९७५० रुपये प्रतिक्विंटल असलेले तुरीचे भाव आता ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदा सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची मदार तुरीवर होती. गेल्या काही हंगामात तुरीला मिळालेल्या उच्चांकी दराने यंदा पेरणीक्षेत्र वाढले होते.
वाढीव व नगदी पैसा मिळवून देणाऱ्या तुरीपासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. बाजारातील स्थिती मात्र झपाट्याने बदलू लागली आहे. एकीकडे कापसाची अशी स्थिती आहे तर दुसरीकडे दुय्यम पीक असलेल्या तुरीचा हंगाम चांगला आला आहे. त्यात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असताना तुरीचे भाव दिवसागणिक घसरत आहेत. काही दिवसापूर्वी जळगावात प्रत्यक्षात तूर ९,७०० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचली होती. आता शेतकऱ्यांनी शेतातील तूर काढायला सुरवात केली आहे.
यातच जळगावात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट १६०० ते १७०० रुपयांनी घसरण झाली. ही बाब तूर उत्पादकांची चिता वाढविणारी आहे, परंतु हे दर सध्या तरी हमीभावापेक्षा जास्त आहेत. शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तुरीचे भाव आता ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. आगामी काळात तुरीच्या दरात अशीच घसरण सुरु राहिल्यास शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.