⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आता उन्हाळ्यात एक मिनिटही वीज पुरवठा बंद होणार नाही; मोदी सरकारने बनवली जबरदस्त योजना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । उन्हाळा सुरु झाला की विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. गतवर्षी अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागला. त्याचे कारण म्हणजे गतवर्षी कोळशाचा पुरवठा न झाल्याने देशातील विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतील उत्पादनावर परिणाम झाला झाल्यामुळे संकट ओढवले होते. मात्र यावेळी मोदी सरकारने एक जबरदस्त योजना बनवली असून त्यामुळे एक मिनिटही वीज पुरवठा बंद होणार नाहीय.

उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वेने नवा आराखडा तयार केला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला कोळसा पुरवठा करण्यासाठी दररोज 600 मालगाड्यांचा वापर करण्यासाठी रेल्वेने रोडमॅप तयार केला आहे. या संदर्भात, रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, जूनपर्यंत कोळशाची जास्तीत जास्त मागणी 75 दशलक्ष टन (MT) पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

गरजेनुसार कोळशाच्या वाहतुकीसाठी दर महिन्याला 35-40 मालगाड्या वाढवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. रेल्वे कोळशाच्या वाहतुकीसाठी जूनपर्यंत सुमारे 4,000 वॅगन किंवा 80 मालवाहू गाड्या जोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, कोळशाची मागणी वाढल्याने जून आणि जुलैमध्ये कोळशाच्या वाहतुकीसाठी आणखी 60 मालगाड्या देण्याचे नियोजन केले आहे.

सध्या दररोज 460 मालगाड्यांचा वापर केला जातो
देशातील सर्व महत्त्वाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कच्चा माल पुरवण्यासाठी रेल्वे ऊर्जा मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयासोबत काम करत आहे. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, आम्ही कॉरिडॉरवर आधारित दृष्टिकोनावर काम केले आहे. अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या देशात 460 मालगाड्या कोळशाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. उन्हाळा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय दोन वेळेत 80 आणि 60 मालगाड्या जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. अशा प्रकारे, कोळसा वाहतुकीसाठी माल गाड्यांची संख्या 600 पर्यंत वाढेल. या मालगाड्यांमधून दररोज कोळशाचा पुरवठा केला जाईल.

एका मालगाडीमध्ये जवळपास 50 वॅगन्स असतात. ते एकावेळी 4,000 टन कोळसा वाहून नेऊ शकते. वॅगन्सच्या वाढत्या संख्येमुळे, रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या रेकच्या संख्येत सुधारणा करण्याची योजना आखली आहे. 2022 मध्ये देशातील जनतेला वीज संकटाचा सामना करावा लागला. देशातील अनेक राज्यांमध्ये जाहीर किंवा अघोषित सात ते आठ तास वीज कपात करण्यात आली होती. वेळेवर कोळशाचा पुरवठा न होणे हे वीज संकट अधिक गडद होण्याचे प्रमुख कारण होते.