⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

लग्न ठरले, अपघात झाला, ‘त्या’ला अपंगत्वाचा धोका दिसू लागला, ‘ती’ ठाम राहिली अन् विवाह पार पडला

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । विवाहगाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात.. अपघातामुळे एक तुटू पाहणारी विवाहगाठ वधू आणि वधूपित्याच्या निर्धारामुळे बांधली गेली. विशेष म्हणजे तरुणाला अपघातात अपंगत्व येऊनहीं युवतीही ठाम राहिली. चार महिन्यांपूर्वी ठरलेला विवाह नुकताच पडला.

रेल्वेत चढताना घडला अपघात

भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथील धनराज मोरे यांचा मुलगा नितीन व बभळाज (ता. शिरपूर) येथील सुनील वाघ यांची मुलगी भावना यांचा विवाह चार महिन्यांपूर्वीच जुळून आला. २४ डिसेंबर रोजी विवाह होणार होता. दोन्ही परिवाराकडून लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. नितीन मोरे हा अंकलेश्वर (गुजरात) या ठिकाणी नोकरीस आहे. १७ डिसेंबर रोजी रेल्वेत चढत असतानाच त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडला. यात मार लागल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तो स्वतः चालू शकेल याची काहीच शाश्वती नव्हती. या घटनेने दोन्ही परिवाराच्या आनंदावर जणू विरजण पडले. इकडे नवरदेवाचा अपघात झाला असल्याने वधूकडील काही मंडळींनी हा विवाह मोडून टाकण्याचा सल्ला, पण वधूचे वडील सुनील वाघ व पत्रकार दीपक वाघ यांनी या प्रकारास नकार दिला आणि लग्नानंतर जर असा प्रकार घडला असता तर काय केले असते, याची जाणीव करून दिली. संबंध तुटणार नाहीत, असे बजवायलाही ते विसरले नाहीत.

अपघातानंतर नितीनचे अपंगत्व दूर होईल की नाही, याविषयी वैद्यकीय यंत्रणाच गोंधळात होती. भावना पूजलेला नितीनही दुखण्याने हताश होता. म्हणून त्याने अनेक दवाखान्यांच्या पायऱ्याही झिजवल्या. शेवटी शस्त्रक्रियेचा पर्याय समोर आला. नितीनवर शस्त्रक्रिया झाली आणि चार महिन्यांचा कालवधी उपचारात गेला. तिकडे भावना नितीनचे दुःख हलके व्हावे म्हणून देव्हाराही पूजत गेली. चार महिन्यांनंतर नितीनचा पाय जमिनीवर पडला….भावनाचे मन जपण्यासाठी तोही चालण्याचा सराव करु लागला आणि कालांतराने नितीन व्यवस्थितरित्या चालायला लागला. त्यानंतर त्याने धाव घेतली…भावनाच्या कपाळी कुंकू भरायला… तिच्या कपाळावरच लेणं व्हायला…उपरणेगाठ बांधत अक्षदा झेलायला..तो दिवस उगवलाही…२१ मे… आता त्यांच्या आयुष्याची वाटही सजली…दोघांनी जोडीने प्रवास करावा म्हणून.