जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । रस्त्यावर बसलेल्या कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून कार उलटली. त्यामुळे झालेल्या अपघातात कारमधील ४७ वर्षीय महिलेला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना चाळीसगाव-नागद रस्त्यावर हातले गावाजवळ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर घटना अशी की, शहरातील हनुमान वाडी भागातील रहिवासी तथा मेडिकल व्यावसायिक व जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप ताराचंद बेदमुथा हे नागद येथील भावाला भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह त्यांच्या स्कोडा कार (क्र. एमएच ०४ एफ एफ ९५२३) या गाडीने नागदकडे जात हाेते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास हातले गावाजवळील वीट भट्टीजवळ समोर रस्त्यावर कावळा बसलेला असल्याने संदीप बेदमुथा हे त्यास वाचवण्यास गेले, मात्र त्यात त्यांचा कारवरील ताबा सुटून कार उलटली. त्यात कांचन बेदमुथा (वय ४७) यांच्यासह संदीप बेदमुथा (वय ५०), सायराबाई बेदमुथा (वय ७५), जागृती बेदमुथा (वय २६) व देवेश बेदमुथा (वय २०) हे गंभीर जखमी झाले. कांचन यांना अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. कन्नडच्या आमदारांनी दिली अपघाताची माहिती या झालेल्या अपघाताची माहिती कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी संदीप बेदमुथा यांचे चुलत भाऊ दीपक जैन यांना कळवली. दीपक जैन यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना खाजगी वाहनातून शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कांचन बेदमुथा यांना तपासून मृत घोषित केले. तर संदीप बेदमुथा, सायराबाई बेदमुथा, जागृती बेदमुथा व देवेश बेदमुथा यांना जबर मार लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दीपक जैन यांनी दिलेल्या माहितीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.