⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

बाप रे..! अचानक केळी बागेला आग, दोन शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील गिरडगावजवळ केळीच्या बागेला आग लागून साडेपाच हजार केळी खोड जळाले. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यासाठी यावल नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता.

अचानक आग

गिरडगाव येथील आदिवासी पावरा वस्तीला लागून गोरख पाटील व बापू ठाकूर (रा.किनगाव) यांची शेती आहे. या दोन्ही शेतात केळी लागवड केली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या शेतांमध्ये अचानक आग लागली. ही घटना लक्षात येताच पोलिस पाटील अशोक पाटील, एसटी चालक भैय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने अग्निशमन बंब बोलवले. पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी यावलचे पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन पाटील हे दाखल झाले. बंबाच्या सहाय्याने तास तास मेहनत घेऊन आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्ही शेतामधील केळी बाग जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. मात्र, अधिकृत आकडा पंचनामा झाल्यावरच समोर येईल.