जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, रात्रीपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. अशातच पुढील तीन तास जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी (दि.३०) मुसळधार पावसाने झोडपले. एकाच दिवसात या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काल एकाच दिवसात ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही चालू हंगामातील जळगाव शहरातील एकाच दिवसातील सर्वोच्च नोंद ठरली आहे.
आज देखील मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये, तसेच नदी, नाले, पूरग्रस्त भाग आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.
जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.







