जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । जेईई परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्येत गेलेल्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. जळगावातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.यश गणेश खर्चे (वय १८) असे या विद्यार्थ्याचे असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावच्या मेहरुण येथील जोशीवाडा परिसरात यश खर्चे हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. मेहरु परिसरात असलेल्या राज विद्यालयात १२ मध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान १३ फेब्रुवारीला जेईई परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाले होते. यामुळे तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
घटनेच्या पूर्वी १३ फेब्रुवारीला कुटुंबीयांसह त्याने रात्री जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी (ता.१४) सकाळी यश खाली न आल्याने त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली. बराचवेळ दार ठोठावून आवाज दिला, तरी प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला. रूममध्ये मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी धाव घेत यशला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.