जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२६ । जळगाव जिल्ह्यासह तापी खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज शनिवार, 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाचे 30 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 5,128 घनमीटर प्रति सेकंद (1,81,095 क्यूसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. .

धरणाची सध्याची पाणीपातळी 211.190 मीटर असून धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) 214.000 मीटर आहे. धरणातील एकूण (Gross) पाणीसाठा 243.60 दशलक्ष घनमीटर (62.78 टक्के) असून उपयुक्त (Live) पाणीसाठा 110.60 दशलक्ष घनमीटर (43.37 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे. सध्या उजव्या कालव्यातून 5.66 घनमीटर प्रति सेकंद (200 क्यूसेक) पाणी सोडण्यात येत असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या 24 तासांत एकूण 195 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 21.7 मिमी पाऊस झाला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








