जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । शहरातील कांचननगर परिसरातील एका वृद्धाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

रतन निना साळुंखे (वय ७४, रा. कांचननगर) असे मयताचे नाव आहे. कांचननगरात साळुंखे हे पार्टिशनच्या घरात एकटेच होते, तर त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या घराच्या जुन्या घरात होते. सायंकाळी ५च्या सुमारास ते पंखा सुरू करण्यासाठी उभे राहिले. पंख्याला हात लावताच त्यांच्या हाताला विजेचा जोरदार झटका लागल्याने ते पंख्यासह फेकले गेले. विजेचा धक्का इतका जबर होता, की खाली केासळल्यावरही त्यांच्या हाताला पंखा चिकटलेलाच असल्याने उजव्या हाताला जखम झाली आहे.

दरम्यान, साळुंखे यांच्या शेजाऱ्यांना कळताच त्यांनी मदतीला धाव घेतली. साळुंखे कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने साळुंखे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तपासनीअंती डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना असा परिवार आहे.











