…म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही? शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

नोव्हेंबर 12, 2024 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२४ । आपण ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेल्याचा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांना एका पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत केला. आता त्यानंतर शरद पवारांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री न केल्याचे कारण समोर आणले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

sharad pawar bhujbal

शरद पवार म्हणाले की, 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी वरीष्ठ म्हणून माझ्यापुढे छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र त्यानंतरचं भुजबळांचं राजकारण पाहा, त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यावेळी छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं असतं, तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं शरद पवार म्हणालेत. तसंच अजित पवार यांचा तेव्हा मुद्दाच नव्हता असंही शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार त्यावेळच्या राजकीय घडामोडींबद्दल बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचा तेव्हा मुद्दाच नव्हता, आम्ही त्यावेळी अधिक मंत्रीपदं घेतली होती. माझे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले होते. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले होते. नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ते गरजेचं होतं असं शरद पवार म्हणाले. तसंच विलासराव देशमुख हे काँग्रेसी विचारांचे होते, त्यामुळे ते काँग्रेसचे असले, तरी ते मुख्यमंत्री झाले हे योग्यच झालं असं शरद पवार म्हणालेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now