जळगाव लाईव्ह न्यूज । भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला असून सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘भोंदू खरात’ प्रकरणावरून चाकणकर यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र विरोधकांकडून प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी सुरूच होती.

अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना चाकणकर यांनी स्वतःचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. “माझ्यावर होत असलेले आरोप खोटे व निराधार आहेत, सत्य लवकरच समोर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तपास पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली असून या घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आता रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










