खान्देशातील प्रवाशांसाठी दिलासा : दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार !

मार्च 30, 2026 9:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. याबाबतची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.

train jpg webp

विशेष गाडी असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो.

प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी संख्या, मागणी आणि सोयी सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या निर्णयाचे स्वागत करत खान्देशातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तूर्त दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी तीन एप्रिलपासून ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी ३० मार्चपासून २९ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now