⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

RBI च्या नव्या नियमाने आता बनावट नोटा होणार हद्दपार? काय हे त्वरित जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । देशात नोटबंदीनंतर दोन हजार आणि पाचशे रुपयाच्या नवीन नोटा चलनात आल्या होत्या. यानंतर देशात बनावट नोटा हद्दपार होणार अशी अपेक्षा होती. परंतु मागील गेल्या काही काळात बनावट नोटांची विक्री प्रचंड वाढली आहे. दरम्यान, अशातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक नवा नियम लागू केला असून यामुळे बनावट नोटा चलनातून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.

काय आहे तो निर्णय?
येत्या काळात बनावट नोटांपासून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे. कारण आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर म्हणाले की, नाणे डिस्पेंसरमध्ये बनावट नोटा टाकल्या जात असल्याच्या घटना पाहता UPI आधारित पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, या मशिन्समध्ये टाकण्यात येणारे पैसे अनेक प्रकरणांमध्ये बनावट असल्याचे आढळून आल्याने अडचण निर्माण झाली आहे.

नवीन प्रणालीमुळे नाण्यांच्या वितरणात सुधारणा होणार आहे
हे पाहता आरबीआयने दुसऱ्या पर्यायावर विचार सुरू केल्याचे शंकर यांनी सांगितले. बरेच लोक मोबाईल वापरतात, ज्याद्वारे QR कोड ‘स्कॅन’ केला जाऊ शकतो, जो UPI शी लिंक केला जाऊ शकतो. याद्वारे भौतिक पैशांचा वापर न करता व्हेंडिंग मशीनमधून नाणी काढता येतात. ते म्हणाले की, देशातच यंत्रे विकसित झाली आहेत. या नव्या प्रणालीमध्ये नाण्यांच्या वितरणात सुधारणा होणार आहे.

खात्यातून पैसे कापून आरबीआय नाणी देईल
तत्पूर्वी, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ‘क्यूआर’ कोडवर आधारित ‘कॉइन वेंडिंग मशीन’ (क्यूसीव्हीएम) वर पायलट प्रोजेक्ट सुरू केला. RBI 12 शहरांमध्ये QR कोड आधारित नाणे वितरणासाठी पायलट प्रकल्प सुरू करणार आहे. ही व्हेंडिंग मशीन UPI ​​वापरून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापून नाणी पुरवतील. सध्या उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये बँक नोटा टाकून नाणी काढली जातात.

सत्यापन आवश्यक नाही
दास म्हणाले, “कॅश कॉईन व्हेंडिंग मशीनमध्ये भौतिकरित्या पैसे घालण्याची आणि त्याची पडताळणी करण्याची गरज नाही.” सुरुवातीला 12 शहरांमध्ये 19 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आहे. रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल्स, मार्केट या ठिकाणी ही मशीन बसवण्यात येणार आहेत. शंकर म्हणाले की, आरबीआयला एक विचित्र समस्या भेडसावत आहे. एकीकडे, नाण्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना साठवण्यासाठी अधिक जागा आवश्यक आहे. तसेच त्याचे योग्य वितरणही होत नाही.