शेतकऱ्यांसाठी RBI चा मोठा निर्णय: तारणमुक्त कर्जाची मर्यादा दोन लाखांपर्यत वाढविली

डिसेंबर 16, 2024 12:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्ष सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शेतकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. आरबीआयने तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवलेली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज मिळणार आहे.

rbi collateral free loan

सध्या स्थितीला आरबीआय कडून 1.60 लाख रुपयांचे तारण मुक्त कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. मात्र या रकमेत वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आता आरबीआयने शेतकऱ्यांना कृषी उपयोगासाठी देण्यात येणाऱ्या विनाहमी कर्जाची मर्यादा 1.60 लाख वरून २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवीन मर्यादा आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून?
या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज मिळणार आहे. ही नवी मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल, असं कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आरबीआयनं २०१० मध्ये कृषी क्षेत्राला विनाहमी कर्ज देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा एक लाख रुपये विनागॅरंटी देण्याची घोषणा केली होती, जी २०१९ मध्ये वाढवून १.६ लाख रुपये करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळं लघु व मध्यम शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्या शेतीवर परिणाम होत होता. रिझर्व्ह बँकेनं वाढवलेली मर्यादा या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांकडं साधनसामुग्री अत्यंत मर्यादित होती, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विनाहमी कर्जाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळं विशेषत: लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (८६ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रफळ) अधिक कर्ज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कृषी मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now