जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२६ । मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली होती. धरणांतील जलसाठाही झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याचे पाणी आणि सिंचनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली असून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील एकूण जलसाठा ६४.३० टक्के इतका झाला आहे. विशेष जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाच धरणांनी शंभरी गाठली असून गिरणा धरणही शंभरीच्या उंबरवठ्यावर आहे.

गिरणा धरण :
जूनच्या अखेरीपर्यंत गिरणा धरणातील जलसाठा अवघ्या २१ टक्क्यांवर आला होता. मात्र, जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आता गिरणा धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले. आज मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळच्या आकडेवारीनुसार गिरणा धरणात ९९.२२ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी गिरणा धरणातील जलसाठा केवळ ६५.७३ टक्के होता. यंदा त्यात मोठी वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव या आठ तालुक्यांतील प्रमुख नगरपालिका, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावांचा पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. अध्याचा धरणातील वाढता जलसाठा शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक ठरत असून खरीपनंतर आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता अधिक सक्षम होणार आहे.
वाघूर धरणातही समाधानकारक जलसाठा
तसेच जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातही ७१.०८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला आहे. गतवर्षी याच दिवशी वाघूर धरणात ६५.०२ टक्के जलसाठा होता. त्यामुळे यंदा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनेही परिस्थिती अधिक समाधानकारक असल्याचे चित्र आहे. सध्या आज सकाळी वाघूर धरणाचे २ गेटे ०.९० मी व ४ गेट ०.६० मी. ने उघडण्यात आले असून १७,३३२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग वाघूर नदीत सोडण्यात आले आहे.
हतनूर धरणात ४१.३७ टक्के जलसाठा
दरम्यान, हतनूर धरणात सध्या ४१.३७ टक्के जलसाठा असून हतनूरचे सध्या ६ दरवाजे २ मीटरने उघडून २४,३२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आले आहे.
पाच मध्यम प्रकल्प तुडुंब; अंजनीही शंभरीच्या उंबरठ्यावर
जुलैच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्येही मोठी भर पडली आहे. अंभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा आणि बोरी या पाच मध्यम प्रकल्पांनी १०० टक्के जलसाठा गाठला आहे. अंजनी धरणात ९९.११ टक्के जलसाठा असून तेही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर मोर धरण – ८७.६०, अग्नवती ५६.३५, बहुळा ८५.०३, तोंडापूर ४०.१९, गुळ ५२.५१, भोकरबारी, ३४.०२, मन्याड ४०.२०, शेळगाव बॅरेज १.३० टक्के इतका जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत.
पुढील काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील उर्वरित धरणांतील जलसाठ्यातही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.







