⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

रावेर तालुक्याला संततधार पावसाचा मोठा फटका ; केळीचे मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । काही दिवसाच्या ब्रेकनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील रावेर तालुक्याला संततधार पावसाचा मोठा फटका बसला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी खरिपाची पिके पाण्याखाली गेली असून केळी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. दरम्यान,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान, रावेर तालुक्यात संततधार पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी मुसळधार जलधारा कोसळल्या आहेत. यामुळे तापीसह सर्व नद्या आणि नाल्यांना पूर आलेला आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे ४२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान,या पावसाचा रावेर तालुक्याला मोठा फटका बसला आहे.

रावेर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने आधीच येथे सतर्कतेचा इशारा दिला असल्याने संभाव्य हानी टळली. यात प्रामुख्याने तापी नदीच्या बॅक वॉटरमुळे समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये निंबोल ते ऐनपुर रस्त्यावर बॅकवॉटरचे पाणी आल्यामुळे येथून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. नेहता, उटखेडा आदी गावांमध्येही हीच समस्या निर्माण झाली आहे. खिरवड, निंबोल, ऐनपूर, निंबोल, निंभोरा सीम, धुरखेडा आदी गावांमधील काही ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर तालुक्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या पावसाचा केळी पिकाला देखील मोठा फटका पडला आहे. अतिवृष्टीमुळे केळीचे नुकसान झाले असून याची पाहणी देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.