जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेश भक्तांची पुरती तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. यानंतर आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त पुढील काही तासांत मुंबईसह, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सांगली या जिल्ह्यांत पुढील काही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा होसाळीकर यांनी दिला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1568930700413358081?s=20&t=c8VJVejxAaXxDnlhcJsEhQ

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे. १२ सप्टेंबरपासून मुंबईसह ठाणे, कोकण, भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यासह जिल्ह्यात गणपती विसर्जन दिवसापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.












