⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चाळीसगावात उन्हाळी कांद्याला मिळतोय चांगला भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । सततच्या पावसामुळे उन्हाळी कांदा खराब होण्याची स्थिती असल्याने चाळीसगाव येथील कांदा बाजारात कांद्याची आवक गेल्या काही दिवसापासून वाढली आहे. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. येथील बाजार समितीतील कांदा मार्केटमध्ये दररोज एक हजार ते पंधराशे क्विंटल कांद्याची आवक होत आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षापासून कांदा बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारात कांद्याची आवक होत आहे. सततच्या पावसामुळे घरात वा चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकरी हा कांदा सडून नुकसान होणेऐवजी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

येथील कांदा बाजारातही सध्या चांगला भाव कांद्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे अधिक मिळत आहे. चार दिवसांपूर्वी येथील बाजारात कांद्याला 1500 ते 1600 रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला होता. गुरुवारी या दरात 500 ते 600 रुपयांनी उसळी घेतली व तो 2277 रुपयांपर्यंत पोहोचला?.