⁠ 
शनिवार, मे 4, 2024

खड्ड्याने घेतला महिलेचा दुसरा बळी, एकाच आठवड्यात दुसरी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । रावेर तालुक्यातील पातोंडीजवळ आज सकाळी एका ४८ वर्षीय महिलेचा खड्डा चुकवताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून खड्ड्यांमुळे मृत्यू होणारी ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

मिरा रविंद्र वाघोदे (वय ४८ रा. चिनावल) असे मयत महिलेचे नाव आहे. दुचाकीवर आई व मुलगा मुक्ताईनगर कडे जात असताना पातोंडी नजिक खड्डा चुकवताना सदर महिला दुचाकीवरून खाली कोसळल्या. दरम्यान, डोक्याला दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारार्थ रावेर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी मृत्य घोषीत केले. खड्डा चुकवतांना मृत्यु झाल्याची चर्चा रावेर ग्रामीण रुग्णालयात जमलेल्या नागरीकांमध्ये होती.

मात्र, अशीच घटना बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर रावेर नजिक घडली होती. यामध्ये देखिल एका महिलेचा मृत्यु झाला होता. आज पुन्हा हा अपघात घडला असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग वर पडलेले खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.