⁠ 
रविवार, मे 19, 2024

बसवाहक, चालकांची मनमानी; पालक विद्यार्थ्यांसह रास्ता रोको करणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। पातोंडा येथून शालेय व महाविद्यालयीन असे सुमारे दोनशेवर विद्यार्थिनी अमळनेर येथे दररोज ये-जा करतात. पातोंडा येथून जलद व शटल सर्व प्रकारच्या बसेसला थांबा आहे. परंतु राज्य परिवहन बसचे वाहक व चालक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास हेतुपुरस्सर मनाई करतात.

चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना तासंतास पातोंडा व अमळनेर बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) चोपडा – साक्री (साक्री आगार) बसचे वाहक भूषण गुरव (बिल्ला नंबर २६३५३) यांनी पातोंडा येथून विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिला. उपस्थित पालकांनी विचारपूस केली असता पालकांशी उर्मटपणे उत्तरे दिली.

प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करून अर्वाच्य भाषेचा वापर केला, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केल्यानंतर पालक महेंद्र पाटील, भूषण पवार, रामकृष्ण लोहार, संभाजी पाटील, गोरख शिंदे आदी पालकांनी वाहक भूषण गुरव याच्याविरोधात अमळनेर आगारप्रमुख पठाण यांच्याकडे फोनवरून तक्रार केली.

परंतु राज्य परिवहन अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. दरम्यान, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची लेखी तक्रार पालकांनी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचेकडे केली आहे. राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी ही समस्या त्वरित सोडवावी; अन्यथा पालक विद्यार्थ्यांसह रास्ता रोको करणार असल्याचे पालकांनी सांगितले.

“पातोंडा बसस्थानकावर राज्य परिवहनच्या सर्व बसेसला थांबा आहे. विद्यार्थ्यांना अमळनेर ये-जा करताना शटल व जलद बसेच्या वाहकांनी बसमध्ये चढू न देण्याची तक्रार प्राप्त झाली असून, चोपडा व अमळनेर आगारप्रमुखांना फोनवरून सांगितले आहे. तसेच अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, साक्री आगारप्रमुख, धुळे व नाशिक विभागप्रमुखांना वाहकांच्या वर्तवणुकीबाबत लवकरच लेखी स्वरूपात पत्र पाठविण्यात येतील.” – दि. गु. बंजारा, वाहतूक नियंत्रण, अधिकारी, जळगाव