⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाळधी सभा.. बाळासाहेबांची इच्छा मोदी साहेबांनी पूर्ण केली – मुख्यमंत्री शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । बाळासाहेबांची इच्छा होती मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरचे कलम ३७० हटवतो. राम मंदिर बांधण्याची इच्छा बाळासाहेबांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांच्या माध्यमातून ती पूर्ण केली. आम्ही अभद्र आघाडी नव्हे तर चांगली युती केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

तसेच धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला ट्रामा सेंटर मान्यता करण्याची निर्मिती करणे. धरणगाव येथे बालकवी ठोंबरे यांचे स्मारक करणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करायचे आहे. धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक उभारले जाईल अशा घोषणा त्यांनी केल्या. कोळी समाजाचे निवेदन द्या, आपल्याला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे. एसटीचे प्रश्न देखील सोडविले जातील. गुलाबराव पाटलाने पन्नास खोके घेतल्याचे आरोप केले जातात. गुलाबराव पाटलाने कोणतेही खोके घेतलेले नाही, त्याला गरज देखील नाही. तो स्वतः एक निष्ठावान सैनिक आहे, असा उच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून दुपारी ५ च्या सुमारास त्यांनी पाळधी येथे जाहीर सभा घेतली. सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आणि जळगावसाठी घोषणा देखील केल्या. प्रसंगी व्यासपीठावर भाजप, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, जळगावात जे-जे प्रश्न आहे ते सर्व मी सोडवणार. शिवसेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटलांचा मी चाहता आहे, म्हणून मी त्यांना ठाणे, पालघरला त्यांना निवडणुकीला बोलावतो. शिवाजी पार्कवर गुलाबराव पाटील जेव्हा भाषण द्यायचे तेव्हा नवचैत्यन्य निर्माण व्हायचे. माझ्यापेक्षा त्यांचा भाषण चांगले होईल हि भीती असल्याने गुलाबरावांचे भाषण बंद करण्यात आले. एकनाथ शिंदे नेहमी कार्यकर्त्याला मोठे करतो. आम्ही कार्यकर्त्यांना मोठे करतो म्हणून बाहेरील शिवसेना देखील आम्हाला येऊन मिळाली, असे ते म्हणाले.