⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

उत्तर-मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । काही दिवसापासून राज्यातील तापमाचा पारा वाढला होता. काल रविवारी बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा 20 अंशावर गेल्याने उन्हाचा चटका बसत होता. मात्र, आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. आज जळगावातील तापमानाचा पारा ११.४ अंशावर होता. पण येत्या काळात पुन्हा उन्हाचे चटके वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवली आहे.

आज पुण्यातील एनडीए याठिकाणी सर्वात कमी किमान नोंदलं असून येथील पारा 9.8 अंशावर पोहोचला होता. तर शिरूर 10.3, हवेली 10.9, पाषाण 11 आणि माळीण येथील 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील किमान तापमान 11 ते 18.8 च्या दरम्यान नोंदलं गेलं आहे. यासोबतच आज सातारा 14.7, महाबळेश्वर 15.4, जळगाव 11.4, नाशिक 11.3, माळेगाव 14, बारामती 12.9, मुंबई 17.1, जेऊर 14, औरंगाबाद 15.5, अहमदनगर 10.5, उस्मानाबाद 17 आणि नागपूर याठिकाणी 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे.

राज्यात तापमानाचा पारा घसरला असला तरी पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याकडून कोणताही इशारा दिला नाही. काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही.