⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महाराष्ट्रावर कोरोनाच संकट असताना फडणवीसांकडून कुत्र्या- मांजराचा खेळ सुरुय ; खडसेंचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । कोरोना संकटाच्या काळात भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली.

 

महाराष्ट्रावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी सत्ताधारी विरोधी पक्ष हातात हात घालून संकटाशी सामना करतात. हिच आपली परंपरा आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कुत्र्या- मांजराचा खेळ करत आहेत, तो त्यांनी खेळू नये असा बोचरा टोला एकनाथ खडसे लगावला आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रविवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.

 

‘राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता निर्यातबंदी झाली आहे. त्यामुळे लवकरच साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने करोनाच्या या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

‘फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करत आहेत. आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसे यांनी हाणला.