⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मनपा विशेष : कचऱ्याच्या प्रदूषणाने नागरिक बेहाल, मनपासह लोकप्रतिनिधींचे हात वर

जळगाव लाईव्ह न्यूज ।मनपा विशेष । मनपा हद्दीतील आव्हाणे शिवारात मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. मनपाकडून याच प्रकल्पाच्या ठिकाणी शहरातील दैनंदिन कचरा टाकला जात आहे. अशा कचऱ्याची विल्हेवाट न लावता येत असल्याने तो पेट घेत आहे. यातून विषारी धूर हा बाहेर पडत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे.मात्र मनपासह लोकप्रतिनिधींचे हात वर असून ते यावर चक्कार शब्दही काढत नाहीयेत.

या बंद पडलेल्या प्रकल्पामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. पर्यायी हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महासभेत मंजुरी मिळवूनही अद्याप हा प्रकल्प रखडला आहे.
शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. हा कचरा लवकर पेट घेतो आणि वातावरणामध्ये सल्फर डायॉक्साईडचे निर्मिती होते. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

अशावेळी घनकचरा प्रकल्पावर लवकरात लवकर निर्णय घेणे अतिशय गरजेचे आहे. सोमवारी यासंदर्भात सर्वपक्षीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना आयुक्त विद्या गायकवाड यांनी सांगितले. अशावेळी प्रकल्पासंदर्भात लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मात्र न झाल्यास त्याचा थेट परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होउ शकतो.