जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२२ । यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. त्यात ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले. मात्र अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ज्या शेतकर्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही काळ का होईना पण दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महावितरण कंपनी कडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे शेतकरी पुर्णपणे मेटाकूटीला आला आहे.
मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळं राज्यातील शेतकऱ्यांना काही काळ दिलासा मिळणार आहे. बील वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची व व्यक्तीगत असणार्या छोट्या डीपी काढून नेण्याची मोहीम महावितरणने हाती घेतल्याने ऐन हंगामात शेतकरी अडचणीत सापडला आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटाने गेल्या काही वर्षात शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना आता नवे संकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांवर हजारो कोटींची बिले थकली आहेत
महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनी महावितरणच्या म्हणण्यानुसार, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडेच 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वीज बिलांची थकबाकी आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की जर शेतकऱ्यांनी त्यांचे बिल भरले तर त्यांना 50 टक्के सूट दिली जाईल आणि फक्त 4,000 कोटी रुपये द्यावे लागतील. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नव्या आदेशानंतर शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळाला आहे. आता त्यांना फक्त या हंगामाचे बिल भरायचे असून त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही.