जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनतर शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं? त्यांना बंड करण्यास कोणी प्रवृत्त केलं? असे प्रश्न वारंवार विचारले जातात.

त्याचं उत्तर ना भाजपकडून दिलं जातं, ना उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलं जातंय, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यावर खुलासा करण्यात आला. मात्र शिंदे गटाच्या माजी मंत्र्याने यावर पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं होतं असं सांगतानाच महाविकास आघाडीचा निर्णय हा निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणूक होण्याच्या आधीच झाला होता, असा दावा माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.