⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

.. तर बापाचं नाव लावणार नाही ; जळगावात शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेच्या मेळावा पार पडला. त्यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. पाचोरा तालुक्यात किशोर पाटील नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढविली तर त्यांचा पराभव करीन व शिवसैनिक विजयी होईल आणि असे झाले नाही तर बापाचे नाव लावणार नाही, असे आव्हानच सावंत यांनी दिले.

जे सोडून गेले ते कावळे आणि जे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत. हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या. बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेन, असं थेट आव्हानही त्यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. या बंडखोर आमदारांना आगामी काळात मतदार त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा दावाही सावंत यांनी केला.

पुढे ते म्हणाले, बंडखोरांना अडीच वर्षांनंतरच कसे दिवंगत आनंद दिघे आठवले ? सन – १९ जुन १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढविला. ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी रॅली काढली, रॅलीत येण्यासाठी नागरिकांना तीनशे रुपये द्यावे लागले, असा आरोपही सावंत यांनी यावेळी बोलताना केला आहे.