⁠ 
शनिवार, मे 4, 2024

गोदावरी अभियांत्रिकीच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना दिला ‘सक्सेस मंत्रा’

जळगाव लाईव्ह न्यूज| २३ ऑगस्ट २०२३। गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दिनांक २२ ते २९ ऑगस्ट २०२३ या दरम्यान सहा दिवसांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्स अँड ह्यूम्यानिटीज), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. त्यानंतर डॉ. वैभव पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) यांचा सत्कार डॉ. नितीन भोळे यांनी केला.

त्यानंतर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाला शिकवीत असलेले प्राध्यापक, तसेच सर्व विभाग प्रमुख यांची ओळख नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना करून देण्यात आली, जेणेकरून महाविद्यालयाची असलेली नाड अधिकच घट्ट होईल व परस्पर संबंध जोपासले जातील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना महाविद्यालयाबाबत विस्तृत माहिती देताना, महाविद्यालयात असणार्‍या सोयी सुविधा तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्य याबद्दल सांगितले.

‘करिअरच्या सुवर्णसंधी’ या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकताना, नवनवीन क्षेत्रांमध्ये तुम्ही कसे करिअर करू शकतात व त्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम याबद्दल सांगितले. सध्याच्या परिस्थितीत आय.टी. सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना अमाप संधी आहे त्यासाठी लागणारे सॉफ्ट स्किल, विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण यांचा सर्वांगीण विकास या सर्व बाबी वृद्धिंगत करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच अभ्यासक्रमाशी निगडित असलेले ऑनलाइन कोर्सेस चे महत्त्व त्यांनी विशद केले.

विद्यार्थ्यांचा चार वर्षाचा आराखडा आत्ताच तयार करुन फक्त विद्यार्थ्यांनी त्या आराखड्यानुसार मार्गक्रमण केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट नामांकित कंपनीत होईल असे सूतोवाच त्यांनी केले. त्यानंतर डॉ. विजयकुमार वानखडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की पूर्ण जागतिक स्तरावर असलेल्या अभियांत्रिकीच्या संधी व त्याचे रूपांतर करिअरमध्ये कसे करायचे याबद्दल अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगितले. त्याचप्रमाणे निवडक प्रेरक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंतर्भूत असलेले सुप्त गुण जागृत करून जागतिक स्पर्धेमध्ये कसे टिकून राहायचे याबद्दल माहिती दिली.

प्लेसमेंट संदर्भात माहिती देताना महाविद्यालय कशाप्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवते व त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्या प्रकारचा प्रतिसाद आवश्यक असतो हेही त्यांनी नमूद केले.त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसर्‍या सेशनमध्ये गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील सर यांची उपस्थिती त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी समर्पक शब्दात विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. सहा दिवसांच्या या इंडक्शन प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमा साठी समन्वयक म्हणून प्रा.तृषाली शिंपी यांनी काम पाहिले. तसेच प्रथम वर्ष विभागाचे डॉ. सरोज भोळे प्रा.ललिता पाटील, प्रा. संजय चौधरी, प्रा. श्रद्धा वारके यांची मदत या कार्यक्रमासाठी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधुरी निकम व सेजल सोनार या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्वप्रथम डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत असलेला दृष्टिकोन विचारला. त्यानंतर त्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर महाविद्यालय यांचा तुलनात्मक अभ्यास विद्यार्थ्यांना स्पष्ट केला व आपल्या महाविद्यालयात येणारे उपक्रम हे इतरांपेक्षा कसे उत्तम आहे याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी डू इट टुडे हा मूलमंत्र सांगितला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये बर्निंग डिझायर, नेतृत्व गुण असणे महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे त्यांनी काही निवडक पुस्तकांचा उल्लेख केला. त्या मध्ये थिंक ग्रो रिच या पुस्तकांमधील रोचक गोष्टी सांगितल्या. व त्यातील नैतिक मूल्यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुचविले.

स्वतःमध्ये अमुलाग्र बदल घडवायचे असतील, तर तुमची अभियांत्रिकीची चार वर्षे या महाविद्यालयाला समर्पित करा. त्याच बरोबर शिस्त, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य यावर आपले प्रभुत्व महाविद्यालयीन कालावधीतच विकसित करा. नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देश व विदेश या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे ५००० च्या वर माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने तुमचीही नामांकित कंपन्यांचे मध्ये निवड होऊ शकते, तसेच तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतात.

फक्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी तयार केलेल्या रोड मॅप वर चालायचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून नियमित योगाभ्यास करण्यासाठी आवाहन केले.तसेच संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी त्यांना नानाविध प्रश्न विचारले त्यामधील काही ठळक मुद्दे म्हणजे त्यांचे बालपण, स्ट्रगल, शैक्षणिक करिअर, राजकीय करिअर व एक शिक्षण सम्राट म्हणून त्यांचा असलेला प्रवास याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

उत्कृष्ट संवादाबाबत डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊ केले.त्याचप्रमाणे त्यांनी पालकांशी हितगुज करून त्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या पाल्यांचे भविष्य हे सुरक्षित हाती आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासोबत तसेच पालकांसोबत फोटोसेशन करून त्यांच्याशी जवळीक साधली. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.