Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । कौटूंबिक कारणातून दाम्पत्य विभक्त झाल्यानंतर खावटी प्रकरणासाठी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, तब्बल सहा वर्षानंतर पती-पत्नीच्या कुटुंबातील सदस्य समोरा-समोर आल्याने त्यांच्यात शाब्दीक वाद विकोपाला गेला अन् तुंबळ हाणामारी झाली. जळगाव न्यायालयाच्या आवारातच बुधवारी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.

जळगावच्या शनिपेठेतील शिरीन बी.यांचे लग्न फातेमा नगरातील सय्यद अफसर सय्यद अख्तर यांच्याशी झाल्यानंतर कौटुंबिक वादामुळे गेल्या सहा वर्षांपासून दोन्ही विभक्त झाले आहेत. मधल्या काळात शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती अफसरसह त्यांच्या कुटुंबांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीने पतीकडून न्यायालयात खावटीसाठी मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली आहे. शिरीनबी यांच्या म्हणण्यानुसार, पती अफसर हा सहा वर्षांपासून न्यायालयात हजर होत नाही, खावटीचे पैसेदेखील देत नव्हता. त्यामुळे बुधवारी न्यायालयीन कामकाजासाठी तो हजर झाला.

यावेळी त्याने न्यायालयाच्या बाहेरच पत्नीसह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. पती अफसर याने दुसरे लग्न केल्याचा आरोपही शिरीनबी यांनी केला आहे. तर अफसर यांच्या दाव्यानुसार, न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात हजर झाल्यांनतर पत्नी शिरीनबीसह तिच्या कुटुंबियांनी बाहेरुन 15 ते 20 गुंड प्रवृत्तीचे लोका बोलावून घेत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.












