⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

धक्कादायक : महिला वसतिगृहात अनैतिक कृत्य?; सामाजिक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी कि, सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी आज २ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे आशादिप महिला वसतिगृह विरोधात तक्रार केली आहे.

मंगला सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले आशादिप महिला वसतिगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात आहे. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून मनमानी कारभार करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करत आहे.

सोमवारी १ मार्च २०२१ रोजी वस्तीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही.

त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वसतिगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत असल्याचा धक्कादायक आरोप देखील कारणात आला आहे.

दरम्यान, आशदिप वस्तीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी केली आहे.  निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.