जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेल्या जामनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क चार एकर उभ्या कापूस पिकावर रोटाव्हेटर फिरवून ते नष्ट केले आहे.

जामनेर तालुक्यातील होळहवेली तांडा येथील शेतकरी रमेश पवार यांनी मोठ्या आशेने आपल्या चार एकर शेतात कापसाची लागवड केली होती. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने जोरदार हुलकावणी दिल्याने पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली. पीक वाचवण्यासाठी पवार यांनी उपलब्ध पाण्यातून बादलीने पाणी देऊन कापूस जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

परंतु, पाण्याचा अभाव आणि वाढत्या उन्हामुळे कापूस पीक डोळ्यादेखत सुकू लागले. अखेर कोणतेही पर्याय न उरल्याने रमेश पवार यांनी चार एकर कापूस पिकावर थेट रोटाव्हेटर फिरवून पीक जमीनदोस्त केले. डोळ्यादेखत उभे पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, पावसाने अशीच पाठ फिरवल्यास इतर पिकेही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे











