⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। अमळनेर तालुक्यातील लोणचारम येथे ३९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) घडली. गृहकर्ज आणि हात उसनवारीचे कर्ज यावर्षी कसे फेडावे, या विवंचनेतून अमळनेर तालुक्यातील लोणचारम येथील शेतकरी संदीप प्रकाश पाटील (वय ३९) याने शुक्रवारी (ता. ४) राहत्या घरी बेडरूममध्ये भिंतीच्या कडीला दोरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाइकांना दिसले.

नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास उतरवत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.चुलतभाऊ विवेक पाटील यांच्या माहितीवरून मारवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या शेतकऱ्याच्या पश्चात वडील, पत्नी व ६ वर्षाची मुलगी असून, त्यांच्याकडे ५ बिघे कोरडवाहू शेती होती. तसेच त्यांच्यावर असलेल्या गृहकर्ज, उसनवारी व इतर कर्जामुळे ते गेल्या काही दिवसापासून नैराश्यात वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.