⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अतिक्रमण निर्मूलन विभागाची मदार फक्त १७ कर्मचाऱ्यांवर : मनपाचे दुर्लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । महानगरपालिका अंतर्गत असलेला अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यांच्या अपूर्णतेमुळे दुर्बल झाला आहे. एके काळी या विभागात असलेल्या ७० कर्मचाऱ्यांवरून अवघ्या १७ कर्मचाऱ्यांवर हा विभाग येऊन टेपला आहे. तरी देखील अधिकारी, पदाधिकारी या विभागाकडे लक्ष देण्यास तयार नाही. या कारणाने शहरातील चौक – चौकांमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढीस पोषक वातावरण मिळत असल्याची हि चर्चा आहे.


तत्कालीन उपायुक्त संतोष वाहुळे जळगाव महानगरपालिकेत असतांना शहरातील अतिक्रमणावर त्यांची मजबूत पकड होती. कारण त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही होता. असे असतानाच आपला विभागही त्यांनी त्याकाळी मजबूत ठेवला होता. त्यांनी अतिक्रमण विभागात २० – २५ नव्हे तर ७० कर्मचाऱ्यांची फौज तयार करून ठेवली होती. जी एका आवाजावर अतिक्रमणे तोडून टाकत असे, यामुळे अतिक्रमण धारकांमध्येही भीतीचे वातावरण होतेच. या उलट आत्ताची परिस्थिती दिसते. त्याकाळी कितीही मोठा अतिक्रमणधारक असो, कितीही मोठं अतिक्रमण असो त्याची हय – गय झाली नव्हती. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले दिसते. शहरातील सुभाष चौक, गणेश कॉलनी, अजिंठा चौफुली, बसस्टँड परिसर, स्वातंत्र चौक, फुले मार्केट, नेहरू चौक, स्टेशन रोड परिसर, नेरी नाका, गोलानी मार्केट, चित्र चौक, नटवर चौक, बहिणाबाई गार्डन जवळील महेश चौक, आकाशवाणी चौक, एम.जे कॉलेज जवळील परिसर या भागात अतिक्रमण दिवसे – दिवस वाढतांना दिसतात. यावर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई तरी काय करणार ?, अस्थाव्यस्त झालेली शहरातील पार्किंग व्यवस्था, ठीक-ठिकाणी थांबा नसतानाही अनधिकृत पणे रिक्षा चालकांनी स्वतः बनविलेले स्टॉप. यामुळे महिला, लहान मुलं, वयोवृद्ध आणि रोज बाजार करण्यासाठी येणाऱ्यांना होणार त्रास सत्ताधारी तरी कुठे सोडवू शकतात.


यासाठी महत्वाचा असलेला हा विभाग सशक्त करणे गरजेचं आहे. पण एकीकडे कर्मचाऱ्यांच्या अपूर्णतेमुळे होणाऱ्या या त्रासाकडे अधिकारी लक्ष देत नाही तर पदाधिकाऱ्यांना शासनदरबारी असलेली आकृती बंधाची फाईल मंजूर करून आणण्यात नव्हे तर जळगावात बसून एकमेकांचे उणे – दुणे काढण्यात स्वारस्य वाटते. हेच कारण अतिक्रमण धारकांना फावले असून ठिकठिकाणी अतिक्रमण वाढीस हे वातावरण पोषक ठरत आहे.