⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

बोगस खतांमुळे १५ एकरातील कपाशी फेकली; कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। जळगाव येथील शेतकरी सुधाकर पाटील यांनी आपल्या १५ एकर कपाशीच्या शेतात सरदार ॲग्रो फर्टिलायझर (गुजरात) कंपनीचे खत दिले. परंतु दोन महिन्यानंतर पिकाला फुले, कळ्या येत नसल्याने अखेर वैतागलेल्या व हतबल झालेल्या या शेतकऱ्याने संपूर्ण शेतातील कपाशी उपटून फेकली. कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

तोंडापूर परिसरात कुंभारी बुद्रुक, ढालगाव, ढालसिंगी, मांडवे, खांडवे, भारुडखेडा येथील १३५ शेतकऱ्यांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानात सरदार ॲग्रो फर्टिलायझर कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरल्याने सुरुवातीला पिकाची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी सुधारणा करण्यासाठी विविध औषधी व खतांचा वापर करून सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले.

कपाशीचे पिक वाढले. मात्र फुले, कळ्या येत नसल्याने कपाशीची पाहिजे तशी वाढ होऊन उत्पन्न होणार नाही. दरवर्षीप्रमाणे कापूस पिकणार नसल्यामुळे तीनही भावाच्या प्रत्येकी ५ एकर कपाशीच्या पिकाची १५ एकर पीक उपटून काढण्यात आले. कपाशीच्या आत मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. दोन ते अडीच महिने होऊनही कपाशीच्या पिकात सुधारणा झाली नसल्याने व संबंधित ज्या कंपनीचे खत वापरण्यात आले. ते खत नाशिकच्या प्रयोग शाळेत जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांनी तपासणीसाठी पाठवले असता अप्रमाणित आढळून आले आहे.

मात्र आजपर्यंत ज्या दुकानदारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्याच्याकडून किंवा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, नुकसान झालेल्या शेतात मंत्री गिरीश महाजन यांनी कपाशीच्या पिकांची स्वत: येऊन पाहणी केली होती. त्याच शेतातील कपाशी शेतकरी सुधाकर पाटील व पदमाकर पाटील यांनी १५ एकर कपाशी शेतातून उपटून टाकली आहे. झालेल्या कपाशीच्या पिकाचे नुकसान दुकानदार व सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनी गुजरात याच्याकडून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.