⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एलईडी पथदिव्यांमुळे वाचतेय मनपाची ५० टक्के वीज, लाईट बंद असल्यास अशी करा तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । शहर मनपाने जळगाव शहरातील सर्व खांबावर पथदिवे बसविले असून पूर्वीच्या तुलनेत मनपाची तब्बल ५० टक्के वीज बचत होत आहे. ईएसएल कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले असून महापौर जयश्री महाजन यांच्या पुढाकाराने पथदिवे संदर्भात तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

जळगाव महानगरपालिकेतर्फे ईएसएल या कंपनीला जळगाव शहरात पथदिवे लावण्याचे काम देण्यात आले होते. तत्कालीन महासभेत एक मताने हा ठराव पारित करण्यात आला होता. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी कंपनीला कार्यादेश देण्यात आले होते. गेल्या महिन्यात कंपनीने काम पूर्ण केले आहे.

जळगाव शहरात आधी १५ हजार ४६७ इतके पथदिवे होते. त्यानंतर ईएसएल कंपनीने शहराचे सर्वेक्षण केले असता जळगाव शहरात १९ हजार ७७ खांब आढळून आले. ईएसएलने शहरात १९ हजार ३२८ पथदिवे बसविले. एलईडी व्यतिरिक्त इतर लाईट मिळून सध्यास्थितीत २० हजार ५०० पथदिवे आहेत.

शहरात असलेल्या एलईडी पथदिव्यांना यापूर्वी १३११ किलोवॅट इतकी वीज प्रतिदिन लागत होती. मात्र आता केवळ ६८९ किलोवॅट इतकीच वीज लागत आहे. शहरातील पथदिव्यांची आज ५० ते ५२ टक्के वीज बचत होत आहे. या कंपनीला या पथदिव्यांची सात वर्षे देखभाल व दुरुस्ती करायची आहे.

नुकतेच महापौर जयश्री महाजन यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या सुविधेसाठी एक हेल्पलाइन नंबर देखील सुरु करण्यास सांगितलं आहे. टोल फ्री क्रमांक १८००१८०३५८० यावर किंवा कंपनीच्या वेबसाईटवर देखील नागरिकांना तक्रार करता येणार आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ती ४८ तासात सोडविणे आहे कंपनीला बंधनकारक आहे.