⁠ 
रविवार, मे 5, 2024

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार, ‘या’ जिल्ह्याना अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महिन्याभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होत आहे. वर्षभर निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचे नुकसान झाले आहे. आता काढणी दरम्यानही हे नुकसान अटळ असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने काढणीवर आलेला रब्बी हंगाम मातीमोल होण्याची भीती आहे.

मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मंगळवारी राज्यभर ढगाळ वातावरण होते. याचा परिणाम आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात काल ढगाळ वातावरणाने तापमान २ अशांनी घसरून ४१ अंशांपर्यंत खाली आले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असता तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. असे असले तरी दोन-तीन दिवसांत ढगाळ वातावरण निवळून शनिवारपासून तापमान पुन्हा वाढेल.