⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

धरणगावात कर्फ्यू, जाणून घ्या नेमके कारण..

Dharangaon News । जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । धरणगाव शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रमण बुधवारी मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. दरम्यान, गावात शांतता कायम राहावी यासाठी आज रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्रमांक १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ काढण्याबाबत आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे आज सकाळी धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम १४४ लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवस कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

पोलिसांकडून खबरदारी म्हणून शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त लावला होता. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

अतिक्रमण हटविण्याबाबत गावात काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी धरणगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. प्रांतअधिकारी विनय गोसावी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी केल्यामुळे गावात सगळीकडे शांतता होती.

वाचा नेमका काय आहे आदेश

उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग विनय गोसावी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02/11/2022 चे रात्री 08.00 वाजेपासुन दिनांक 04/11/2022 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केला आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे गांभीर्य लक्षात घेता वेळेअभावी सदरचा आदेश एकतर्फी लागु करण्यात येत आहे. सदर आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगांव शहरातून जानारे मुख्य रस्त्यावरुन वाहतुक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही.